पणजी:- दोन दिवसापूर्वीच कर्नाटक सरकारने, म्हणजेच काँग्रेसने आपल्या बजेट मध्ये, तिथल्या कळसा भांडुरा प्रकल्पासाठी १००० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. राज्यात सेव्ह म्हादय सेव्ह गोवा च्या बॅनर खाली ठिकठिकाणी जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे हृदयनाथ शिरोडकर व महेश म्हांबरे हे सक्रिय सदस्य होते. आज त्यांच्याकडून या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात एक शब्दही येत नाही. याचाच निषेध करण्यासाठी रेव्होलुशनरी गोवन्स च्या मनोज परब यांनी काल पत्रकार परिषद बोलाविली होती.
यावेळी पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले की, काँग्रेस आणि बीजेपी पक्षाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हादयी नदीवर राजकारण केले. या दोन्ही पक्षाने आमच्या म्हादयी नदी वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाही. सेव्ह म्हादय सेव्ह गोवा या अभियानात काँग्रेसचे सदस्य होते. आज ते कुठेच दिसत नाही. आज वेळ आली आहे, सेव्ह म्हादय सेव्ह गोवा तर्फे कर्नाटक मध्ये कळसा – बंडूरा प्रकल्पा विरोधात सभा बोलाविण्यात यावी. जर असे केले तर आर.जी. सर्वात पुढे असेल अशे वचनही परब यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान दिले.
यादरम्यान सांत आंद्रे तील आमदार विरेश बोरकर यांनी काँग्रेस पक्षाच्या घाणेरड्या राजकारणावर बोलताना म्हटले की, निवडणूक समोर ठेवून जे म्हादयी वाचविण्याची भाषा करत होते, ते काँग्रेस पक्षाचे नेते आता कुठे गेले, आर.जी. पक्षाने सुद्धा सेव्ह म्हादयी सेव्ह गोवा बरोबर यावे असे म्हणणारे आता कुठे गेले? आता त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया का येत नाही? आता काँग्रेस पक्षाच्या राजकारण्यांनी पक्षप्रमुख राहुल गांधी यांच्याकडे म्हादयी वाचविण्यासंदर्भात आग्रह धरावा. तेव्हाच काँग्रेस पक्ष गोवेकरांच्या बाजूने असल्याचे सिद्ध होईल असे विरेश बोरकर म्हणाले. काँग्रेस – बीजेपी पक्षाच्या नेत्यांनी जनतेला वेड्यात काडु नये, त्यांनी थेट आता कर्नाटकमध्ये भव्य सभा घेऊन म्हादयी बाबत कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शवावा असेही बोरकर म्हणाले.