सिंधुदुर्ग – आंबोली नांगरतास येथे स्थिरावलेल्या टस्कराने तब्बल अर्धा तास आंबोली-सावंतवाडी महामार्ग रोखून धरल्याची घटना नुकनीच घडली आहे. त्यांच्या या अचानक एन्ट्रीमुळे घाबरलेल्या वाहनधारकाने दुरध्वनीवरुन वनविभागाला माहिती दिली.
याबाबत खुद्द उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी परिसरात टस्कर आला असून वाहनधारकांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
याबाबतची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास नांगरतासवाडी परिसरात आंबोली-सावंतवाडी राज्यमार्गावर भला मोठा टस्कर तब्बल अर्धा तास थांबला होता.
त्यामुळे दोन्ही बाजूने येणार्या गाड्या थांबल्या होत्या. त्यात अडकलेल्या एका स्थानिकाने मला फोन लावला. यावेळी तुम्ही काहीही करू नका तो हत्ती आपोआप निघून जाईल, असे त्यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी तसेच केले काही वेळाने हत्ती जंगलात निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान परिसरात आता सहा हत्ती आहेत. यात एक टस्कर आंबोली परिसरात फिरत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच परिसरात हत्तीकडुन झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जाईल. त्यामुळे त्यांना हुसकावून लावू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.