सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पाणी आल्याने बंद शहरातील आळवाडी बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. यामुळे येथील व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने आळवाडी येथे व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्यात. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
गतवर्षी संपर्ण बांदा शहराला पुराच्या पाण्याने वेढल्याने व्यापारी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज सकाळीच नदीचे पाणी पत्राबाहेर येऊन आळवाडी बाजारपेठेत घुसले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते आळवाडी मच्छीमार्केट रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. येथील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मदतकार्य केले. सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, सुनील धामापूरकर, हनुमंत आळवे, पोलीस हवालदार संजय हुंबे, राकेश केसरकर यांनी घटनास्थळी धाव घेत पूरस्थितीची पाहणी केली. पाण्याची पातळी वाढत असल्याने सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आळवाडी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.