मानकरी मंडळी, गावकरी व चाकरमानी यांच्या साथीने कोकणच्या संस्कृतीची अनुभूती देणाऱया शिमगोत्सवाची धुम रत्नागिरी जिल्हय़ात सुरू झाली आहे. शुक्रवारी 28 रोजी पहिल्या होळीचे सर्वत्र वाजत-गाजत आगमन झाले. या शिमगोत्सवात 3 हजार 3 ठिकाणी खासगी तर 1 हजार 243 सार्वजनिक होळय़ा उभ्या राहणार आहेत. 1095 ग्रामदेवतांच्या पालख्या रुपे लावून सजणार असून त्यानंतर भक्तांच्या भेटींसाठी निघणार आहेत.
कोकणवासीय व शिमगा यांचे अतुट नाते आहे. कोकणी माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेला तरी होळी सणासाठी त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. रत्नागिरी 5 ते 15 दिवस शिमगोत्सव साजरा होतो. ग्रामदेवतांच्या पालख्यांची लगबग, शंकासूराचा मार, गोमूचा नाच, शिमग्याची सोंगं जणू काही आनंदाची पर्वणीच. ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) लावण्यात येतात. त्यानंतर ग्रामदेवतेची पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. त्यानंतर होळीपौर्णिमेला शिमग्यांची सांगता केली जाते.
शुक्रवारी 28 रोजी फाकपंचमीला गावातील वाडय़ा-वस्त्यांवर सर्वत्र होळय़ांचे वाजत-गाजत आगमन झाले. विधीवत पूजा करून होळी उभ्या करण्यात आल्या. ढोल-ताशांच्या गजरात व फाकांच्या आरोळय़ांनी शिमगोत्सवाची धुम खऱया अर्थाने सुरू झाली आहे. गावा-गावातील ग्रामदेवतांच्या पालख्यांनाही रुपे लावण्याच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे.