सिंधुदुर्ग – मी माझ्या मंत्रीपदाच्या काळात असलेल्या जमिनी विकल्या, मात्र कोणतेही चुकीचे काम केले नाही. त्यामुळे आमदार नितेश राणेंनी माझ्यावर केलेले चुकीचे आरोप पंधरा दिवसात मागे घ्यावेत, अन्यथा जमीन घोटाळे कोणी केले याचे पुरावे देतो, असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे दिला.
दरम्यान मी राणेंच्या विरोधात कधीही नव्हतो, मात्र कोण माझ्या अंगावर आले तर त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही, त्यामुळे संजू परब हा विषय आज माझ्यासाठी संपला. कोणी जमीनी घेतल्या आणि कोणी घोटाळे केले, याचे आत्मचिंतन प्रत्येकांने करावे, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रका परिषद घेतली. यावेळी त्यांनी नितेश राणे यांनी केलेल्या टिकेला आपण पंधरा दिवसानंतर उत्तर देणार असल्याचे जाहीर केले.
आपण मंत्री असताना कोणताही अपहार केला नाही.गोव्यात असलेली जमीन ही ५० वर्षापुर्वीची आहे.त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही. मी मंत्रीपद घेतल्यांनतर माझ्या जमिनी विकल्या या काळात माझी कुठेही जमिन वाढली नाही.
ही वस्तूस्थिती आहे .त्यामुळे त्यांनी केलेले आरोप मागे घ्यावेत,अन्यथा जमिन घोटाळे कोण करतो हे पुराव्यानिशी बोलेन. एमटीडीसीच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी मी दिला आहे. त्या कामाचा दर्जा तपासणे पालिकेचे काम आहे. खेळणी निकृष्ठ असली तर ती बदलून घ्यावी, माझ्यावर आरोप करून काही होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
मी जॅकी श्रॉफ सारख्या अनेकांना खासगी गुुंतवणूकींसाठी या ठीकाणी आणले. त्या मागे येथिल युवकांना रोजगार मिळावा हा उद्देश्य होता. त्यात मी काय गुन्हा केला, असे मला वाटत नाही, असे केसरकर म्हणाले.