सिंधुदुर्ग – जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. ते कणकवलीत बोलत होते.
जनआशीर्वाद यात्रेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, यावेळी अपशकून झाला मात्र शिवसेनेचे १०-२०च्या वर कुठे कार्यकर्ते दिसले नाहीत, असे ते म्हणाले. तसेच एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, अशी टीका राष्ट्रवादीवर केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राणेंवर टीका करताना निधी येत नसल्याचे म्हटले होते. यावर राणे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार अज्ञानी असल्याचे ते म्हणाले.
आपले खाते रोजगार निर्माण करणारे असल्याचेही ते म्हणाले. माझ्याकडे असलेले खाते दरडोऊ उत्पन्न वाढवणारे, जीडीपी वाढवणारे, निर्यात वाढविणारे असून सर्वांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
संजय राऊत यांनी स्वत:च्या मालकांच्या मुलांकडे लक्ष द्यावे. माझ्या मुलांची काळजी करू नये. माझी मुले हुशार आहेत. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे. राणेंवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेत चांगली वागणूक मिळते.
सामनातील अग्रलेखात वैयक्तिक टीका केली तर प्रहारमधून त्यांच्यावर टीका करणार असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत यांना आपण किंमत देत नाही, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती होत आहे, असा घणाघात त्यांनी केला