रत्नागिरी जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली आहे. त्यानुसार संचारबंदीची व्याप्ती वाढवण्यात आली असून यापुढे ग्रामीण भागातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुचाकींवरही बंदी घालण्यात आली आहे. पॉझीटीव्ह अहवाल आलेलया शृंगारतळी येथील एकमेव रुग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.
जिह्यातील 51 संशयितांच्या स्वाबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 45 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 5 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. पॉझीटीव्ह अहवाल आलेलया शृंगारतळी येथील एकमेव रुग्णाच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. दरम्यान, शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरी भागात दुचाकीवरही बंदी घालण्यात आली आहे.
नव्याने एक तरुणी जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झाली आहे. पुणे येथून आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. . जिल्हा रुग्णालयात अजून 25 रुग्णांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. परदेशातून शुंगारतळी येथे आलेल्या एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हात खळबळ उडाली होती. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती अतिशय उत्तम आहे. लवकरच त्यांची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. या तपसाणीचा अहवाल आल्यानंतरच त्याला रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.
दरम्यान शनिवारी जिल्हय़ात रेल्वेची धडधड कानी आल्याने अनेकांचे डोळे विस्फारले. वेबसाईटवर जाऊन करंट पोझिशन तपासली असता रोहा-मडगाव अशी स्थिती दिसत होते. तथापी अधिकृतरित्या माहिती घेतली असता ही प्रशासकीय हलवाहलवीसाठी ही गाडी धावल्याचे स्पष्ट करण्यात आले.रेल्वेचे सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश आंबर्डेकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की रेल्वे सेवा थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या गाडय़ा मूळ ठिकाणी नेण्याचे धोरण रेल्वे प्रशासनाचे आहे. ज्या विभागाच्या त्या गाडय़ा आहेत त्या, त्या विभागात पोहोचवण्याचे काम देशभर सुरु आहे. या धोरणाचा भाग म्हणून शनिवारी ही गाडी रोहा ते मडगाव धावत आहे. त्यात कोणतीही प्रवासी वाहतूक नाही. गेले दोन दिवस डबल डेकर रत्नागिरीत उभी होती. ती रोह्याला पाठवण्यात आली. गाडय़ांची केवळ प्रशासकीय कारणास्तव हालचाल होत आहे.