मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग आला असून आतापर्यंत १४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आलं आहे व हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर (रायगड) ते झाराप (सिंधुदुर्ग) या ३६६ किलोमीटरच्या पट्ट्याचे चौपदरीकरण युद्धापातळीवर सुरू आहे. हा संपूर्ण रस्ता काँक्रीटचा असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून हे चौपदरीकरण केले जात आहे. दहा टप्प्यांत त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे नियोजन असून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साह्याने चौपदरीकरणाचे काम केले जात आहे. आतापर्यंत १४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँकीटीकरण पूर्ण करण्यात आले असून पनवेल ते इंदापूर या ८४ कि.मी. रस्त्याचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे तर इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विभागीय अभियंता (निरीक्षण) विवेक नवले यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ३६६ कि.मी. रस्त्याचं काँक्रीटीकरण युद्धपातळीवर एकाचवेळी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाचे चौपदरीकरण करत असतानाच पाच मीटर रूंदीचा दुभाजक ठेऊन त्यात वृक्षारोपण व दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत, असेही त्यांनी पुढे नमूद केले. ३६६ किलोमीटर अंतरात ६ टोल प्लाझा असतील, असेही सांगण्यात आले.