मार्च अखेरीस सरकारने मागे घेतलेले पैसे परत द्यावेत आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
127

 

सिंधुदुर्ग – मार्च अखेरीस ‘बीडीएस’द्वारे ज्या-ज्या विभागाला पैसे दिले होते, ते मागे घेतले आहेत, ते परत देण्यात यावेत. कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाचे उर्वरित काम पूर्ण करून त्याचा वापर कोविडसाठी करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्य सचिव आशिष कुमार यांना यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री 10 ते 1 पर्यंत

आमदार नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग हा छोटा जिल्हा असून याठिकाणी विलगीकरणाचे 250 बेड आहेत. सिंधुदुर्गात येणाऱ्या मुंबईतील  चाकरमान्यांची संख्या पाहता, प्राथमिक तयारी म्हणून जिल्हय़ात विलगीकरणाचे बेड वाढविण्याची मागणी करण्यात आली. कुडाळ येथे महिला बाल रुग्णालयाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याचे उर्वरित काम पूर्ण करून ते कोविडसाठी वापरावे. शासनाच्या तिजोरीवरील भार कमी व्हावा म्हणून सरकारने 26 मार्चला बीडीएसद्वारे सार्वजनिक बांधकाम, मत्स्य, नियोजन, ग्रामविकास या विभागांना दिलेले पैसे मागे घेतले आहेत. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. ते पैसे पुन्हा त्या-त्या विभागाकडे वर्ग करावेत, अशी मागणी नाईक यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.  रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गमध्येही अद्ययावत कोविड लॅबसाठी परवानगी देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्गमधील लॅबचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here