बाळासाहेबांनी जोशींना हटवून राणेंना मुख्यमंत्री केले आणि उद्धव विरुद्ध राणे संघर्ष सुरू झाला

0
39

सिंधुदुर्ग – नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. या संघर्षाला नेमकी सुरवात झाली ती नारायण राणे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा. 1995 साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते. 1999 साली बाळासाहेबांनी जोशींना हटवून राणेंना मुख्यमंत्री केले आणि उद्धव विरुद्ध राणे वादाची पहिली ठिणगी पडली.

नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याची माहिती देणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक ( No Holds Barred – My Years in Politics ) अत्यंत महत्वाचे आहे. या पुस्तकात नारायण राणे यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला. नारायण राणेंना अवघं नऊ महिन्यांचं मुख्यमंत्रिपद मिळालं. महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. या निवडणुकीत सेना-भाजप युतीचा पराभव झाला. नारायण राणेंनी आपल्या याच आत्मचरित्रात या पराभवाचं खापर उद्धव ठाकरेंवर फोडलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी मराठा बहुजन चेहऱ्याची गरज आहे, हे बाळासाहेबांना जाणवलं होतं. म्हणूनच राणेंच्या गळ्यात तेव्हा मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली. मात्र नऊ महिने मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मुदतपूर्व निवडणुकीत राणेंचे उमेदवार बदलण्यात आलेत याबाबतही त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे कि, महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. 1995 पासून सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवताना 171-117 असा फॉर्म्युला ठरवला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून 10 जागा इतर मित्र पक्षांना देण्याचे निश्चित केले. शिवसेनेच्या उमेदवारांची नावं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीनं सामना मध्ये गेली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ती पाहिली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर 15 उमेदवारांची नावं बदलली आणि आम्हा सर्वांना अंधारात ठेवून निर्णय घेतला, असा आरोप त्यांनी या पुस्तकातून केला आहे.

महत्त्वाचं म्हणजे ज्या 15 उमेदवारांची नावं उद्धव यांनी बददली होती. त्यांपैकी 11 उमेदवार हे अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षांतून लढले आणि विजयीही झाले. या निवडणुकीत शिवसेनेचे 69 उमेदवार निवडून आले. हे अकरा बंडखोर आमदार पक्षात असते, तर सेनेच्या आमदारांची संख्या 80 झाली असती. भाजपचेही 56 आमदार निवडून आले होते. त्यामुळे अपक्ष आणि अन्य लहान पक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करणं युतीला शक्य झाले असते. काही लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने युतीचा आकडा 136 वर गेला होता. मात्र तरीही बहुमतासाठी 9 जागा कमी पडत होत्या. असेही राणेंनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. दरम्यान यावेळी प्रयत्न कडूनही पक्षाकडून साथ मिळाली नसल्याने राणेंचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले. उद्धव ठाकरे यांनी नाव बदलली नसती तर अन्य पक्षात गेलेले शिवसेनेचे ते उमेदवार शिवसेनेतून निवडून आले असते मात्र उद्धव यांच्यामुळे शिवसेनेला फटका बसला, त्यात आपले मुख्यमंत्रीपद गेले याचे शल्य राणेंच्या मनात आजही आहे.

अनेक लहान पक्ष आणि अपक्ष आमदार यांच्या सहकार्याने विलासराव देशमुख यांचे सरकार बनले होते. राणे यावेळी विरोधी पक्षनेते होते. सरकारला अक्षरशः मेटाकुटीला आणण्याचे काम राणेंनी केले. सण 2002 मध्ये अपक्ष आणि लहान पक्षांनी विलासरावांच्या सरकारचा पाठिंबा काढला. नारायण राणे यांच्या महत्वकांक्षा पुन्हा जाग्या झाल्यात. त्यांनी सरकार कोसळण्याच्या सर्व हालचाली सुरु केल्या. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘सत्तेशिवाय आपली घुसमट होते, असं काही नाही. या सरकार पाडण्याच्या मोहिमेला आपला पाठिंबा नाही, असं स्पष्ट केलं. राणेंची मुख्यमंत्री होण्याची दुसरी संधी हुकली. या सगळ्याच्या मागे उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप आपल्या पुस्तकातून राणे यांनी केला आहे.

अखेर उद्धव ठाकरें विरुद्ध नारायण राणे हा वाद पेटला तो उद्धव ठाकरे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर. राणेंचा उद्धव ठाकरे यांच्या निवडीला विरोध होता. त्यातच 2002 मध्ये कणकवलीत सत्यविजय भिसे यांची हत्या झाली. यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या राणेंच्या कणकवलीत घराची जाळपोळ झाली. युतीमधला कोणीही नेता आपल्या पाठीशी उभा राहिला नाही याची खंत राणेंच्या मनात होतीच. त्यात उद्धव ठाकरे यांची निवड राणेंना आणखीनच खटकली. राणेंनी सेनेमध्ये पदांचा बाजार मांडला जातोय असा थेट आरोप केला. याच दरम्यान पक्षात आणि राणेँमध्ये दारी वाढत गेली. पक्षात उद्धवराज सुरु झाले होते. राणेंचीही पक्षातली घुसमट वाढली होती. त्यातून 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here