सिंधुदुर्ग – नारायण राणे यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर आरोप केलेत. त्यावेळी त्यांनी विधिमंडळाच्या पायरीवर नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजाचे समर्थन केले. तसेच कणकवली प्रकरणात फिर्यादीला साधे खरचटले असताना 307 कलम लावून नितेश राणेंना निवडणुकीपर्यंत डांबून ठेवण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचे ते म्हणाले.
विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलनावेळी मांजरीचा आवाज काढल्याच्या मुद्दयावरून आमदार नीतेश राणे यांच्यावर सत्ताधारी पक्षाचे नेते आरोप करत आहेत. पण मांजरीचा आवाज काढण्यात एवढे आक्षेपार्ह काय आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आवाज तर मांजरीचा नाही. तसंच आदित्य ठाकरे आणि मांजराचा काय संबंध आहे का असा प्रश्न श्री.राणे यांनी आज केला.
सत्तेचा दुरुपयोग म्हणजेच प्रशासनाचा दुरुपयोग आहे. एका आमदारासाठी राज्यभरचे पोलीस इथे आलेत. इथे कोणी दहशतवादी आलेत का? ‘तो’ हल्ला करणाऱ्यांमध्ये नितेश राणे होते का? कुठूनही नाव गोवायचं आणि निवडणुकीपर्यंत त्यांना कलम 307 लावून बंद करून ठेवायचा डाव विरोधकांनी आखलेला आहे. छातीवर उजव्या बाजूला साधं खरचटल्यावर ‘307’ लागतो, हे पहिल्यांदाच घडतंय. पोलिसांची वागणूक चुकीची आहे, असेही ते म्हणाले. कणकवलीत मारहाणीची घटना झाली. त्यात नीतेश राणेंचा सहभाग नव्हता असेही राणे म्हणाले.