सिंधुदुर्ग – सध्या पडणारा अवकाळी पाऊस हवामानातील तीव्र बदल यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आलेला आहेत. देवगड, मालवण व वेंगुर्ला येथे आंबा उत्पादक शेतकरी हवामानातील बदलानुसार जी किटकनाशक औषधे वापरत आहेत.त्या औषधांचा परिणाम होत नसून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याबाबत कोकण कृषी विद्यापीठाच्या किटक शास्त्रज्ञाच्या माध्यमातून मार्गर्शन व चर्चासत्र सिंधुदुर्ग जिल्हाबँक व स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जाने. रोजी दुपारी ३ वा.भवानी मंगल कार्यालय तळेबाजार येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचेअध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. येथील जिल्हा बँकेच्या शहर शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे उपस्थित होते.
आंबा मोहोरावर सध्या किटकांचे संकट आले असून मोहोरावर विविध प्रकारचे कीटक वेगवेगळी कीटकनाशके फवारणी करूनही जात नसल्याने आंबा पीक धोक्यात आले आहे. अशा वेळी योग्य तज्ञांकडून मार्गदर्शन होण्याकरिता मागणी होत होती.अशाच अनुषंगाने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ यांना मार्गदर्शनाची विनंती केली आहे . त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व आंबा बागायतदारांनी घ्यावा असे आवाहन सावंत यांनी केले आहे. आंबा पिकाबाबत हवामानावर आधारित पीक विमा योजनेत केंद्र सरकारने २०२० मध्ये निकषात बदल केला आहे. २०२१ – २२ या वर्षात या योजनेत जाचक निकष राहू नयेत याबाबतही या शेतकरी मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. आंबा व काजू पिकाच्या मार्केटिंगसाठी आंबा व काजू प्रोडूसर कंपनी स्थापन करण्यासाठी या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आंबा पिकाला थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी याबाबतही या मेळाव्यात चर्चा करण्यात येणार आहे. दरवर्षी हवामानात होणाऱ्या बदलामुळे गेल्यावर्षी वापरलेले कीटकनाशक यावर्षी आंबा काजू मोहरावर चालत नाही. त्यामुळे हवामानातील हे बदल व त्यासाठी वापरली जाणारी कीटकनाशके याबाबत कीटक शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे स्नेह सिंधूचे संदीप राणे यांनी सांगितले.