महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. यात भाजपने १०४ च्या आसपास जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेशिवाय १४५ चा बहुमताचा आकडा भाजपला गाठता येणार नाही. त्यामुळे यावेळच्या सरकारमध्ये शिवसेनेला कमालीचे महत्त्व आले आहे. त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. खरतर भाजपच्या सत्तेची दोरी शिवसेनेच्या हातात आली असून मागच्यावेळी सत्तेत राहून विरोधीपक्षाचे काम करणाऱ्या सेनेला आता चांगलाच भाव आला आहे.
सत्तेचा समान वाटा हा शिवसेनेचा प्रस्ताव असेल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तेचा ५० टक्के वाटा शिवसेनेने मागितला तर तो देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना आपले राजकीय चातुर्य वापरावे लागेल. त्यामुळे दुसऱ्या टर्मचे हे सरकार चालविताना मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागेल. काही महत्वाची खातीही शिवसेनेला द्यावी लागतील. दुसरीकडे २०१४ च्या विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादी या विरोधकांची संख्या ८३ होती. परंतु आता काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह घटकपक्षांसह विरोधकांचा आकडा ११० च्या आसपास पोचला आहे. या विरोधकांची ताकद वाढली आहे. तसेच भाजप शिवसेना महायुतीला टक्कर देवून या जागा निवडून आल्यामुळे ते यावेळी अधिक आक्रमक असतील. मागील सरकारमध्ये काहींना सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून काहींची कामे करून, तर काहींना पक्षात घेऊन फडणवीस यांनी विरोधकांना कमकुवत केले होते. मात्र त्यांना विरोधकांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळे सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपाला या वेळी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.