सिंधुदुर्ग – गणेशउत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्हा बंदीचे सरकारचे कोणतेही आदेश नाहीत. चाकरमान्यांना १४ दिवसा एवजी ७ दिवसांचे क्वारंटाइन करण्याची खास परवानगी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे मागवी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती खा विनायक राऊत यांनी दिली. कुडाळ येथे ते बोलत होते.
जिल्हाधिकारी यांनी काल अधिकाऱ्यांची गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती. त्यात अधिकाऱ्यांनी काही सुचना केल्या होत्या त्या इतीवृत्ताची प्रत सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. त्याची दखल घेत आज खासदार विनायक राऊत यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. मात्र चाकरमान्यांची ज्या ठिकाणावरून येणार त्याच ठीकाणी कोवीड चाचणी माफक दरात करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिलीय. जिल्हा प्रशासनाचे इतीवृत्त म्हणजे अंतीम निर्णय नसल्याची माहीतीही विनायक राऊत यांनी दिलीय.