सिंधुदुर्ग – शिवसेनेचा आणि मातोश्रीचा आमदार दिपक केसरकर यांच्यावर विश्वास राहीलेला नाही.त्यामुळेच त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले,म्हणून केवळ वरिष्ट नेत्याचे लक्ष वेधण्यासाठी केसरकर राणेंवर टिका करीत सुटले आहेत. अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केली.
दरम्यान फक्त सावंतवाडी शहरापुरते मर्यादीत असलेल्या दिपक केसरकरांना नगराध्यक्षांसह आमदार होण्याची संधी केवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच मिळाली. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसलेल्या केसरकरांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत,असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणेंवर टिका केली होती. तसेच आपण नाराज असल्याचे म्हटले होते. भाजपाकडुन आपल्याला ऑफर होती,पण ती आपण नाकारल्याचा दावाही त्यांनी केला होता.
याच पाश्वर्र्भूमिवर राजन तेली यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांचा आता केसरकरांवर म्हणावा तसा विश्वास राहीला नाही,त्यामुळे त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले.ही वस्तूस्थिती आहे.परंतू त्या ठीकाणी वरिष्टांचे लक्ष वेधण्यासाठी ते राणेंवर टिका करीत सुटले आहेत. मात्र आपण केवळ राणेंच्या पाठींब्यामुळे नगराध्यक्ष आणि आमदार होवू शकलो,हे त्यांनी विसरू नये ,असा सल्ला त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, दीपक केसरकर हे गेले आठ महीने मतदार संघातून गायब होते. काल त्यांनी अचानक जिल्ह्यात एन्ट्री घेत राणेंवर टिका केली.परंतू येथिल जनतेला सुध्दा त्यांचा खरा नेता कोण हे माहीत आहे.त्यामुळे केसरकर यांनी नाहक दिखावूपणा करू नये,असेही त्यांनी यावेळी सांगितले.