सिंधुदुर्ग – गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवसाच्या होम क्वारंटाईनची परवानगी द्या,अशी मागणी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. दरम्यान आयत्या वेळी होणारा त्रास लक्षात घेता, चाकरमान्यांना या ठिकाणी येण्यासाठी आवश्यक असलेले “ई पास”तसेच आवश्यक परवानग्याचे नियोजन आत्ताच करा. जेणेकरून त्यांना सुट्टी घेणे शक्य होईल असेही उपरकर यांनी सुचवले आहे.
मुंबईतील चाकरमानी हा बहुसंख्येने मंत्रालय विभाग, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विविध खाजगी कंपनीत नोकरीस आहे. कोरोना साथीच्या रोगामध्ये मुंबईमध्ये त्यांना ३ महिने क्वारंनटाईन करून ठेवल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक बनली आहे. सिंधुदुर्गातील कोरोना संसर्गाचे कारण दाखवून चाकरमान्यांना १४ दिवसाचे संस्थात्मक क्वारंनटाईन करणे व नंतर १४ दिवसाचे होम क्वारंनटाईन संयुक्तिक होणार नाही. तसेच अनेक चाकरमान्यांचा घरगुती गणपती हा दीड दिवसांचा किंवा ५ दिवसांचा असतो. अशावेळी त्यांना केवळ ५ ते ७ दिवसाची रजा काढून गावी यावे लागते. शिवाय २ दिवस अगोदर येऊन आपली घरे साफसफाई करणे व घराची रंगरंगोटी करावी लागते. त्यामुळे अशाप्रकारे चाकरमान्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना ई-पास देऊन नोंदणी करण्यात यावी. व ज्यांची घरे पूर्णतः रिकामी आहेत त्यांना त्यांच्या घरात फक्त ७ दिवसांचे होम क्वारंनटाईन करण्यात यावे. ज्यांना लॉजिंग व इतर ठिकाणी क्वारंनटाईन होणे शक्य आहे. त्यांना त्याठिकाणी क्वारंनटाईन करण्यात यावे. असे उपरकर यांचे म्हणणे आहे.