सिंधुदुर्ग – कळणे येथील खनिज प्रकल्पातून दूषित पाण्याची गळती होते. हे खनिज मिश्रित सांडपाणी कळणे नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. ही नदी पुढे गोव्याच्या कोलवाळ नदीला मिळते. यावर गोव्यातील चांदेलसह इतर पाणी योजना अवलंबून असल्याने पाण्याचे प्रदुषण रोखण्याची गरज आहे.
दरम्यान, या नदीवरच कळणे गावची नळपाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. गेली दहा वर्षे कळणेत खनिज प्रकल्प सुरु आहे. येथील खोदकाम भूस्तराच्या खाली गेल्याने मोठा तलाव निर्माण झाला आहे. शिवाय एका बाजूने डोंगराचा कडा असून दुसऱ्या बाजूला मातीच्या भरावाची भिंत उभी केली आहे. पावसाळ्यात प्रकल्प अंतर्गत तयार झालेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. हे पाणी गेल्या वर्षीपासून मातीच्या भरावाला छेदून नदीच्या दिशेने असलेल्या ओढ्यात येते. ज्या ठिकाणी हे पाणी नदीत मिसळते. या नदीवरच गावची नळपाणी योजनेची विहिर आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी हीच समस्या होती. स्थानिक अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही.
दरम्यान चांदेल, गोवा मध्ये 15 दशलक्ष क्षमतेचा प्रादेशिक जल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जॅकवेल याच नदीवर आहे. खनिजयुक्त मातीने प्रदूषित झालेले पाणी या प्रकल्पापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्यावर परिणाम होऊ शकतो.