सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. आज जिल्ह्यात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यात सततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक नंद्याना पुर आला आहे. कणकवली ते मालवण सर्जेकोट अशी वाहणारी गड नदी दुथडी भरून वाहत होती. या नदीकिनारच्या गावात पाणी भरले, तर कणकवली आचार मार्गावर पाणी आल्याने मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला होता.
जिल्ह्यात 07 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
आज सावंतवाडीत सर्वाधीक पाऊस पडला, तर जिल्ह्यात 300 मीमी पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पावसाची सततधार सुरूच आहे. कुडाळ मधील मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीलाही मोठापुर आला आहे. तर कुडाळ-माणगाव येथील आंबेरी पुल देखील पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कुडाळ तालूक्याशी 27 गावांचा संपर्क तुटला आहे. कणकवली गड नदीला पूर आल्याने महामार्गावरील वागदे गावातील काही घरांना पाण्याने वेढले होते. सात्रळ गावाकडे जाणारा मार्ग बंद झाल्याने पुढील १० गावांचा संपर्क तुटला आहे. मालवण मसुरे गावातील शेती पाण्याखाली गेली होती. खारेपाटण सुक नदीला पूर आल्याने येथील बाजारपेठेत पाणी घुसले होते.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ व ९ जुलै रोजी अति मुसळधार पाऊस, १० जुलै रोजी मुसळधार पाऊस तर ११ जुलै रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच ८ जुलै रोजी रात्री ११.३० पर्यंत मालवण ते वसई या समुद्र किनारी ३.० ते ४.६ मिटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. वेंगुर्ला ते वास्को या समुद्रकिनारी ८ जुलै रोजी रात्री ११.३० पर्यंत २.९ ते ४.२ मिटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग कडून करण्यात आले आहे.