क्यार चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकण किनारपट्टीला बसला असून किनाऱ्यालगत असलेल्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टी भागातील ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील भातशेती पाण्यात जाऊन अतोनात नुकसान झाले आहे. गुजरातमधील ५०० व केरळमधील ८० नौकांना रायगड जिल्ह्यातील राजपुरी भागात निवारा देण्यात आला आहे. वादळात अडकलेल्या १९७ मच्छिमार नौकांची सुटका करून या नौका तटरक्षक दलाच्या जवानांनी रत्नागिरी किनारी आणल्या आहेत. हे वादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत असून सौराष्ट्रच्या काही भागांमध्ये पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.