महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे. आजचा संपूर्ण दिवस हा महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा पाहण्यास मिळाला. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते हसत हसत बाहेर पडले. त्यानंतर प्रतीक्षा होती ती सोनिया गांधी काय भूमिका घेणार हा प्रश्न प्रलंबित होता. अखेर सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं शरद पवार यांना फोन करुन सांगितलं. पाठिंब्याचं पत्रही फॅक्स केलं, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंब्याचं पत्र शिवसेनेला दिलं. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं आहे. काही वेळातच सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना करणार आहे. निवडणूक निकालानंतर कौल मिळाला होता तो महायुतीला. ज्यामध्ये भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. या दोन्ही पक्षांचं सरकार येणार हे निश्चित झालं होतं. मात्र अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाची अट शिवसेनेने घातली होती. मात्र असं काहीही ठरलं नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेने सरकार स्थापनेची तयारी केली. त्यात उद्धव ठाकरे यशस्वीही झाले. फॅक्सद्वारे दोन्ही पक्षांकडून पाठिंब्याचं पत्र मिळाल्याने शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.