शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची दाट शक्यता असली तरी, येत्या दोन दिवसांत म्हणजे रविवारपर्यंत सरकार स्थापन करणे अवघड असल्याचे संकेत दस्तुरखुद्द शरद पवार यांनी शुक्रवारी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या, रविवारी असल्याने या दिवशी सरकार स्थापन व्हावे, असे शिवसेना नेत्यांचे प्रयत्न व शिवसैनिकांची इच्छा असल्याची चर्चा आहे. मात्र, पवार यांच्या वक्तव्यामुळे हा दिवस टळणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी विविध घटकांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी अनौपचारिक चर्चेदरम्यान रविवार, १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन करावे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. यावर ‘दोन दिवसांत सरकार स्थापन करणे अवघड आहे’. त्यासाठी भरपूर वेळ लागेल, घाईने काही सांगता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडल्याचे कळते.