सिंधुदुर्ग – गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. नारायण राणे कणकवलीत आले असताना ही भेट झाली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे नारायण राणे यांच्यासमोर मांडले. नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर तुमच्या मागण्यांना माझा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे आता नारायण राणे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी काही पाऊल उचलणार का, हे पाहावे लागेल.
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही एसटी संपाचा तिढा अजून सुटू शकलेला नाही. दरम्यानच्या काळात राज्य सरकार आणि आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्यानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली होती. तसेच कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळेल, याची हमीही घेतली होती. यानंतर काही एसटी कर्मचारी संघटनांनी संपातून माघार घेतली होती. परंतु, बहुतांश एसटी कर्मचारी अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत. हे कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत.