रायगड – महाड येथील काजल पुरा परिसरातील तारीक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवारी २४ ऑगस्टला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास कोसळली आहे. या इमारतीत ४८ कुटुंबे राहात होती. ती ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या इमारतीत शेकडो लोक अडकले असल्याचे सांगितले जात आहे. इमारतीचे ३ मजले कोसळले असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे १० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ५० फ्लॅट होते. यात सुमारे २५० लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. स्थानिकांनी आतापर्यंत २५ लोकांना बाहेर काढलं आहे.जे लोक जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ढिगारा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. तब्बल पाच मजली असलेली हि इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा मलबा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे. एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान मोठ्या जीवितहानीचा धोका असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिक्रिया
१ अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
इमारत ५ मजल्यांची होती. त्यातले वरचे ३ मजले कोसळले आहेत. बचाव पथकाला आतापर्यंत २५ नागरिकांना बाहेर काढण्यास यश आलं आहे. इमारतीत ४८ ते ५० कुटुंब रहात असून २००हून जास्त नागरिक राहात असल्याचा अंदाज आहे. घटनास्थळावर पोलीस यंत्रणा देखील पोहोचली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात पोहोचवण्याचं काम सुरू आहे. इमारतीला आधी कुठला इशारा दिला होता किंवा काय याचा तपशील पाहावा लागेल. आसपासच्या इमारतींची परिस्थिती देखील तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इमारत काही फार जुनी नाही. – अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड
२ माजी आमदार माणिकराव जगताप
या इमारतीच्या मलब्याखाली साधारणत: २५० रहिवासी अडकल्याची भीती आहे. जेसीबीच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. बचाव पथक आणि इतर यंत्रणाघटनास्थळी पोहोचेली आहे. ही घटना फारच भयावह आहे. – माजी आमदार माणिकराव जगताप
३ निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. प्रशिक्षित लोकांच्या मदतीने मदतकार्य केलं जात आहे. लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. – जिल्हाधिकारी निधी चौधरी