सिंधुदुर्ग – स्वस्तिक फाउंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमातील सुनीता कोटकर या आजींचे अल्पशा आजाराने आज निधन झाले. या आजी निराधार असल्यामुळे त्यांच्या अंतविधीची जबाबदारी दिविजा वृद्धाश्रमावर होती,मात्र आजींना नेमका अग्नी कोणी द्यायचा असा विचार सुरु असताना आश्रमातील कर्मचारी भारती यशवंत गुरव या पुढे आल्या आणि त्यांनी आजींना मी अग्नी देणार असल्याचे सांगितले. आश्रमाच्या व्यवस्थापनानेही ते मान्य केले आणि नात्याच्या पल्याड जाऊन एका अनोळखी आजीची आश्रमात सेवा करताना निर्माण झालेल्या नात्याला जागत भारती यशवंत गुरव यांनी या आजींना शेवटचा अग्नी दिला.
भारती हिने आजीची अगदी तिच्या मुली प्रमाणे सेवा केली. तिने आजी बरोबर घालवलेला काळ व त्यांच्या मध्ये निर्माण झालेले ऋणानुंध हे अगदी रक्ताच्या नात्याला लाजवणारे होते. आजच्या काळात जिथे कौटुंबिक नाती टिकाव धरु शकत नाही.पण आश्रमातील या सहवासाने निर्माण झालेले आपले पणाचे नाते हेच श्रेष्ठ मानले जावे व एका साधारण स्त्रीने एका मानलेल्या नात्याला दिलेले अंतिम संस्कार ही गोष्ट म्हणजे स्त्री जन्माच्या करून कहाणी पेक्षा समाजाला नवीन दिशा देणारी ठरली आहे. असे यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी सांगितले.
आजीला अखेरचा निरोप देण्याकरिता संस्थेचे संचालक संदेश शेट्ये, दीपिका रांबाडे , सरपंच पंढरी वायंगणकर,कर्मचारी सखाराम कोकरे,अतुल गुरव ,व आश्रमातील आजी आजोबा प्रतिनिधी सतेज रणखांबे आदी उपस्थित होते .
दिविजा वृद्धाश्रम उपेक्षित निराधार गरीब गरजू लोकांसाठी कार्यरत राहणारी कोकणातील अग्रेसर संस्था आहे.त्यांच्या या माणुसकीच्या सामाजिक कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.