सिंधुदुर्ग – जिल्ह्यासाठी covid-19 आजाराच्या प्रतिबंधक लसीचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करावा. किमान प्रत्येक टप्प्यात २ लाख लसचा पुरवठा करावा.भविष्यात सिंधुदुर्गात लस कमी पडल्यास गोंधळ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशारा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सरकारला केल्यात सूचना
या निवेदनात त्यांनी सिंधुदुर्गातील लसीकरणाबाबत सविस्तर वस्तूस्थिती कथन केली आहे या निवेदनात ते म्हणतात की, सद्या कोविड १ ९ या साथीच्या आजाराला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी विविध उपाययोजना केंद्र व राज्य सरकार मार्फत आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सद्या ४५ वर्षावरील व्यक्तींना व १ मे २०२१ पासून १८ वर्षावरील व्यक्तींना दोन टप्यात प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. याबाबत माझ्या सूचना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार नितेश राणे यांनी या सूचना केल्या आहेत
1 )सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ५६ ठिकाणी आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यामध्ये ४५ वर्षावरील व्यक्तींची संख्या सुमारे २.५० लाख असूनत्यापैकी जिल्हयात अजून पर्यंत १ लाख डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. सद्या परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये लसचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम बंद पडली आहे. तरी आजच्या घडीला सुमारे १.५० लाख डोस तातडीने मिळणे गरजेचे आहे.
२) १ मे २०२१ पासून शासनातर्फे १८ वर्षावरील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये या वयोगटातील व्यक्तींची संख्या सुमारे ८.५० लाख आहे. म्हणजे जिल्ह्याला आजपर्यंत प्राप्त झालेले १ लाख डोस वगळता अजून ७.५० लाख डोसची आवश्यकता भासणार आहे. या वयोगटामध्ये बहूसंख्य तरूण मंडळींचा समावेश असल्याने शासनाकडून पुरेसा साठा उपलब्ध करून न दिल्यास लसीकरण केंद्रावर कर्मचाऱ्यांसोबत वादविवाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
३) सिंधुदुर्ग जिल्ह्याला लस पुरवठा हा कोल्हापूर जिल्हयामार्फत करण्यात येतो. यामध्ये जेव्हा कोल्हापूर जिल्हयाला १ लाख लसीचे डोस पुरविण्यात येतात तेव्हा त्यांचेकडून फक्त १० हजार डोस सिंधुदुर्ग जिल्हयाला वितरीत केले जातात. त्यामुळे सिंधुदुर्गातील लसीकरण मोहीम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाला १ मे २०२१ पासून शासन निर्णयानुसार एकूण ७.५० लाख लसीच्या डोसची आवश्यकता असणार आहे. तरी सदर लसीकरणकामी जिल्ह्याला २ लाखच्या टप्यामध्ये लस उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त व्यक्तींना लस मिळून लसीकरण मोहीम वेगाने राबविली जाईल व जनतेचे आरोग्य सुरक्षित राखता येईल.