सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई,ठाणे परिसराशी संबंधित आहेत. जिल्ह्याची ग्रामीण पार्श्वभूमी लक्षात घेता या ठिकाणी स्थानिक जनतेत संसर्ग पसरल्यास हा रोग येथील मर्यादीत आरोग्य सुविधेमुळे आटोक्यात आणणे अशक्य होईल. जिल्ह्यात आजपर्यंत 12 हजार 800 लोक दाखल झाले आहेत. त्यात येथील संस्थात्मक कॉरंटाईनची मर्यादा संपली आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय चाकरमान्यांना ई पास देऊ नयेत असे पत्र 8 जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त आणि 6 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा के मंजुलक्ष्मी यांनी आपल्या पत्रातून जिल्ह्याच्या सध्यस्थीती आणि ग्रामीण भागातली व्यवस्था याबाबत स्पष्टीकरण देत आपल्या परवानगीशिवाय पास देऊ नयेत असे म्हटले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक जनतेमध्ये झाला तर येथील मर्यादित साधनांमुळे तो रोखणे कठीण जाईल. याची जाणीव स्थानिक जनतेत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या मुंबई, ठाणे, पुणे येथील रेड झोनमधून दाखल होणाऱ्या नागरिक आणि स्थानिक यांच्यात वादाचे प्रकार घडत असून कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे आहेत असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
हे पत्र त्यांनी मुंबई,ठाणे,नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर च्या पोलीस आयुक्त व ठाणे, पालघर, रायगड,नाशिक, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे.



