सिंधुदुर्ग – अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काल दि. १३ जून पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण तसेच शहरी भागातील अत्यावश्यक वगळता एस. टी. च्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्या आजपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांतर्गत तसेच आंतरजिल्ह्यांतर्गत एस. टी. च्या एकूण १७८ फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सिंधुदुर्गात काल दि. १३ जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा वर्तविण्यात आला होता. त्यामुळे ११ ते १३ जूनपर्यंत एस. टी. च्या ग्रामीण तसेच शहरी भागातील अत्यावश्यक वगळता सर्व फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्या आता पूर्वरत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाच्या आगमनावर अत्यावश्यक असणारे साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच इतर जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांना वाहतुकीचे साधन उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे याआधीच एस. टी. च्या साऱ्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचीही जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचण येत होती. परंतु ७ जूनपासून एस. टी. च्या फेऱ्या ५० टक्के प्रवासी क्षमतेने पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या. त्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर काल दि. १३ जूनपर्यंत पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. आजपासून या एस. टी. फेऱ्या पुन्हा एकदा ५०% भारमानासह जिल्ह्यात सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच कोल्हापुर आणि रत्नागिरीतही लालपरी पुन्हा एकदा धावू लागली आहे.



