सिंधुदुर्ग – जिल्हा भाजपच्या वतीने आज ठाकरे सरकारच्या विरोधात येथील प्रांताधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली. कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रोखले जाऊ नये, गणेश मूर्तीच्या उंचीवर निर्बंध घालू नयेत, या उत्सवाच्या कालखंडावर निर्बंध घालू नयेत, ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा पुनर्विचार करावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन तेली, आणि माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन चिके, जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाळा जठार, महेश गुरव, सुदन बांदिवडेकर, संदीप मेस्त्री, असलदे सरपंच पांढरी वायंगणकर आदींनी आज प्रांताधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत जोरदार निर्दशने करण्यात आली.ठाकरे सरकार हाय हाय..मागे घ्या मागे घ्या जाचक आदेश मागे घ्या. गणपती बाप्पा मोरया. अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले आमच आंदोलन हे शासनाच्या निर्णयाविरोधात आहे. सरकार गणेश चतुर्थीबाबत जे निर्णय घेतेय त्यातून कोकणातील गणेश भक्तांची चेष्टा करण्याच काम हे सरकार करतेय. राज्यात १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे. या ग्रामपंचायतींवर सरकारने प्रशासक नेमा असा आदेश काढलेला आहे. प्रशासक नेमण्यापेक्षा या ठिकाणी त्याच सरपंचाना मुदतवाढ देण्यात यावी. अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील अशासकीय समित्यांवर नियुक्त्या देताना विरोधी पक्षाच्या सदस्यांना घेण्याचा कायद्याने असलेला अधिकारही नाकारला जात आहे. असेही तेली म्हणाले.
माजी आमदार प्रमोद जठार म्हणले कि ज्या ज्या चाकरमान्यांना जिल्ह्यात यायचं आहे त्यांना यायला द्या. जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावरती त्यांची मोफत कोरोना चाचणी करा. मात्र निर्णय घेण्यात हे तीन पायाच सरकार अपयशी ठरत आहे. एक निर्णय करतो तर रात्रीत दुसरा बदलतो, दुसरा निर्णय करतो तर तिसरा बदलतो. हे सरकार करोना पेक्षाही भयंकर आहे. असा आरोपही जठार यांनी केला.



