सिंधुदुर्गात काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत

0
416

 

कोरोना’मुळे काजू बागायतदार अडचणीत आले आहेत. काजू बीचे दरही शंभर रुपयांच्या आत आले आहेत. खरेदीही थांबली आहे. शेतकरी ‘कोरोना’मुळे अडचणीत असतानाच काजू बीवर प्रक्रिया करणारे कारखानदारही सध्या अडचणीत आले आहेत. बाजारातील परिस्थिती अनिश्चित आहे. त्यामुळे काजू बी कुठल्या दराने खरेदी करावी? ज्या दराने खरेदी करणार तो दर प्रक्रिया केल्यानंतर मिळणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या बाजारपेठेत पूर्वीचा माल पडून आहे. त्यामुळे नवीन प्रक्रिया केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. काजू बी खरेदीबाबत काजू कारखानदार अनुत्सुक दिसत आहेत. काजू कारखानदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी सांगितले की, सध्या काजू बी खरेदी थांबली आहे. खरेदी करायची तर कोणत्या दराने खरेदी करावी, याबाबत निर्णय घेणे कठीण झाले आहे. सध्या, सण-समारंभ नसल्याने आणि मिठाईची दुकाने बंद असल्याने तसेच निर्यात थांबल्याने गेल्यावर्षी प्रक्रिया केलेला माल बाजारपेठेत शिल्लक आहे. त्यामुळे काजू बी खरेदीबाबत सावध होऊनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

कामगार वर्गालाही फटका

‘कोरोना’मुळे काजू बागायतदार संकटात आहेत. शेतकरी संकटात असतांनाच काजूवर प्रक्ा्रिढया करणाऱया कारखानदारांची परिस्थिती वेगळी नाही. काजू उद्योजक  राज्याने जाहीर केलेल्या 31 मार्चच्या परिस्थितीवर अवलंबून होते. परंतु ‘कोरोना’चे रुग्ण वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चला देशात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे सर्व सेवा ठप्प आहेत. त्याचा फटका काजू
प्रक्रिया उद्योगाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या कामगार वर्गाला बसला आहे. परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने काजू प्रक्रिया उद्योग यंदा अडचणीत आला आहे. काजू बी खरेदी थांबली आहे. त्यामुळे उद्योग बंद आहेत. आता उद्योगासाठी लागणारा काजू बी खरेदीसाठी सवलत देण्याच्या विचारात शासन आहे. परंतु
प्रक्रिया केलेल्या मालाला मागणी कितपत मिळणार, याबाबत अनिश्चितता आहे. गतवर्षीचा प्रक्रिया केलेला माल बाजारपेठेत पडून आहे. जानेवारीपासून मालाला मागणी नसल्याने डब्याचा दर आठ हजारावरून सात हजारावर आला होता. तरीही मागणी नव्हती. त्यात आता ‘कोरोना’चे संकट आले आहे. त्यातून कसा मार्ग काढावा, याची चिंता कारखानदारांना आहे. त्यामुळे काजू बी खरेदीला परवानगी दिल्यानंतर ती कोणत्या दराने खरेदी करावी, याबाबतही कारखानदार विचार करत आहेत.

निर्यात थांबली

सध्या युरोप, आखाती देशात होणारी निर्यात थांबली आहे. बाहेरच्या देशात काजूला मोठी मागणी असते. त्यावर काजूगराचे भवितव्य अवलंबून होते. परंतु निर्यातच थांबल्याने हा उद्योग संकटात आला आहे. आता देशांतर्गत बाजारपेठेवर हा उद्योग चालणार असून परिस्थिती सुधारल्यास उद्योग तग धरू शकेल. अन्यथा   या संकट आणखी गडद होईल, असेही बोवलेकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here