सिंधुदुर्ग – पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्व असलेल्या जिल्ह्यातील ५७ पाणथळ जागांचे पहिल्या टप्प्यातील सर्व्हेक्षण पूर्ण झाले. या मोहिमेला अधिक बळ मिळावे, या हेतुने “सिंधुदुर्ग वेटलॅंड’ शिर्षकाखाली पर्यावरण प्रेमींनी लोकसहभागातून संकेतस्थळ सुरू केले आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच संकेतस्थळ असून त्याचे लॉंचिंग १५ ऑगस्टला सायकांळी ४ वाजता वेटलॅंड समितीचे सदस्य डॉ. अफोज अहमद यांच्या हस्ते होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले. जिल्ह्यातील पाणथळ जागाही त्याचाच एक भाग आहे. पाणथळ ठिकाणाच्या बाजूला पर्यावरणाच्या दृष्टीने असणारी हिरवीगार झाडे, काही ठिकाणी असलेली पुरातन मंदिरे याचा पर्यावरण आणि पर्यटनाच्या नजरेतून विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो ठिकाणे दुर्लक्षित राहिली. त्यामुळे विविध अंगानी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात समुद्री किनारी, भरतीमुळे दलदलीचा भाग, कांदळवन, तलाव, नद्यांचे किनारे आणि गवताळ अन् दलदलीची, अशी ३७३ ठिकाणे आहेत.
याव्यतिरिक्त देखील ठिकाणे असू शकतील. त्यातील इनलॅंड प्रकारात येणाऱ्या 57 पाणथळ जांगाचे सर्व्हेक्षणाचा पहिला टप्पा पुर्ण झाला आहे. यामध्ये मालवण ५ कुडाळ : १७, सावंतवाडी : ८, वेंगुर्ले : ९, दोडामार्ग :२, कणकवली : ११, देवगड : १, वैभववाडी : ४ इतक्या ठिकाणांचा समावेश आहे. वेटलॅंड समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे काम लोकसहभागातून पूर्ण केले. पाणथळ जागा, नैसर्गीक जलस्तोत्राचे संरक्षण व्हावे, त्याचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे आणि नागरिकांनी आपआपल्या परिसरातील अशा जागांचे जतन करावे या हेतूने जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी “सिंधुदुर्ग वेटलॅंड ‘अशी जिल्ह्यातील पाणथळ जागांचे संकेतस्थळ तयार केले. निलेश गावडे, गार्गी शिंगटे, रघुवीरसिंग राठौरे, प्रीतम कुमार, आनंद कुलकर्णी, गणेशसिंग राठौरे या टीमने त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील पाणथळ जागांची माहिती या संकेतस्थळावर मिळणार आहे. देशातील हे पहिलेच संकेतस्थळ आहे.



