सिंधुदुर्ग – वादळग्रस्ताना योग्य ती मदत देणारच. त्याबरोबरच दरवर्षी येणारी वादळे लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सिंधुदुर्ग दौऱ्यात बोलताना सांगितले. तर कोकण आणि माझे नाते अतूट आहे ते कोणीही तोडू शकत नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असे सांगतानाच लॉकडाउनमध्ये शिथिलता येऊ शकते याबाबतचे संकेत त्यांनी यावेळी बोलताना दिले.
भूमिगत वीजवाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारा यासारख्या गोष्टी या कायमस्वरूपी करणे गरजेचे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात अनेक भागात मोठे नुकसान केले आहे . या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा धावता दौरा आज केला. मालवण मध्ये त्यांनी पाहणी केली. दौऱ्याच्या समाप्तीला मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरील कक्षात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. येथील लोक गेली दोन, तीन वर्षे वादळांचा धोका अनुभवत आहोत. अशी वादळे यापूर्वी येथील किनारपट्टीवर नव्हती. आता ती यायला लागली आहेत. वादळांमुळे नुकसान होत असल्याने जो कायमस्वरूपी आराखडा बनविला आहे तो पूर्णत्वास नेणे महत्त्वाचे बनले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मंजूरी किंवा आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून द्यावा. भूमिगत वीजवाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधारा यासारख्या गोष्टी या कायमस्वरूपी करणे गरजेचे बनले आहे. वादळाचा वेग, तीव्रता कमी करू शकत नाही. त्यामुळे नुकसान कमी कसे होईल यादृष्टीने ज्या काही उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जातील. पंचनाम्याचा येत्या दोन दिवसात अंतिम अहवाल मिळाल्यानंतर योग्य ती मदत जाहीर केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाउनमध्ये शिथिलता येऊ शकते, मुख्यमंत्र्यांचे संकेत
सिंधुदूर्गमध्ये उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य करताना, लॉकडाउन कधीही उठू शकतो पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर जेवढी रुग्णवाढ किंवा रुग्णसंख्या आहे त्यातील ७० टक्के लोकांना लक्षणं नाहीत. तरीदेखील बेड कमी पडत आहेत. ती टक्केवारी वाढली तर काय होईल याचा विचार करा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. लॉकडाउन कधीही उठू शकतो पण आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचं पालन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनेही लस मिळाल्यानंतरही मास्क घालणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे. ही बंधनं पाळणं अत्यावश्याक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार
दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. याबाबतही मुख्यमंत्री बोलताना म्हणाले, दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे सांगतानाच परवा आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा हा विषय मांडण्यात आला होता. एक दोन दिवसांत संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना रिपोर्ट तयार करण्यास सांगितलं आहे, त्यानंतर निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.



