मुंबई – महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची मोठी चर्चा रंगली असून सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेकडे लागले आहे. बारामती येथील विमान अपघातात अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी निधनाबाबत रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला असून, या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी त्यांनी आता थेट देशाची राजधानी गाठली आहे. आज, बुधवारी दुपारी १२ वाजता दिल्लीतील प्रेस क्लब येथे ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार असून, यामध्ये रोहित पवार काही ‘डोळे उघडणारे’ खुलासे करण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या दाव्यानुसार, २७ जानेवारी रोजी अजित पवार नियोजित वेळापत्रकानुसार गाडीने पुण्याला जाणार होते आणि त्यांचा ताफाही तयार होता. मात्र, शेवटच्या क्षणी काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यांना आपला प्रवास बदलावा लागला. पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी दादांना थांबवण्यात आले होते, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. तो बडा नेता कोण होता आणि त्या फाईलमध्ये नेमके काय होते, यावरून आता संशयाची सुई फिरू लागली आहे.



