मुंबई – हवामानातील बदलामुळे कोकणातील हापूसचा हंगाम उशिरा सुरू होत आहे. त्यामुळे १५ मार्चनंतर आवक वाढण्याची शक्यता आहे. सध्या केरळमधून रोज ४ ते ६ टन आंब्यांची आवक होत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केरळमधील आंब्याची आवक वाढली आहे. रोज ४ ते ६ टन आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये केरळचा आंबा २०० ते ६०० रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये हे दर ३०० ते ८०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. आंध्र प्रदेशमधूनही काही प्रमाणात आंब्यांची आवक होत आहे. कोकणातून जेमतेम ५ ते १० पेट्यांची आवक होत आहे.
यावर्षी कोकणच्या हापूसचा हंगाम उशिरा सुरू होत आहे. १५ मार्चनंतर आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिलमध्ये आवक सर्वाधिक असेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक वाढली की बाजारभाव कमी होतील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
खराब हवामानामुळे यावर्षी हापूसच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. हापूस आंब्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. १५ मार्चनंतर आवक वाढेल. एप्रिलमध्ये हापूस मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल असे संजय पानसरे, संचालक फळमार्केट यांनी सांगितले .



