राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. हे सरकार बहुमत सिद्ध करताना टिकणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांचा गट फोडून भाजपाला पाठिंबा दिला. अजित पवारांच्या पाठिंब्यावर भाजपानं सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असताना भाजपानं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानंतर शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तिन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी भाजपासोबत जात सगळ्यांनाच अंचबित केलं. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटलेला नाही. सर्व आमदार शरद पवार यांच्या भेटीला येत आहेत. जे आमदार शपथविधीला होते, त्यांना फसवण्यात आले. या सरकारचा शपथविधी झाला असला तरी हे सरकार बहुमत सिध्द करताना टिकणार नाही,” असं नवाब मलिक म्हणाले.