सिंधुदुर्ग – अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनाऱ्यावर चक्रीवादळ स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका कोकण किनारपट्टीला बसायला सुरवात झाली आहे. गोव्यामध्ये पावसाळा सुरवात झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडू लागला आहे. दरम्यान मच्छीमारांनी समुद्रातून तात्काळ मागे परतावे असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले आहे.
किनारी भागात जोरदार वारे आणि लाटांचा तडाखा
आग्नेय अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे केरळ तसेच लक्षद्वीप किनाऱ्यावर चक्रीवादळ निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.तसेच या वादळाचा परिणाम 15 ते 17 मे दरम्यान दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्यावरही होण्याची शक्यता आहे.तसेच 15 व 16 मे रोजी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा आणि सिंधुदुर्गच्या काही भागात आजच पावसाळा जोरदार सुरवात झाली आहे. किनारी भागात सोसाट्याचा वारे वाहत असून समुद्रालाही मोठे उधाण आले आहे. उधाणाच्या लाटा किनाऱ्यावर धडकत असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही भागात किनारची वाळू लाटांच्या तडाख्याने सरकल्याने दिसून आले.
गोमंतकीयांनी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचे आवाहन
दरम्यान अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या प्रभावाने गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने गोमंतकीयांनी सतर्क राहावे, असे आवाहन गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले आहे. समुदात मासेमारीसाठी उतरलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना हवामान खात्याने केली आहे. मच्छिमारांची सुरक्षा महत्त्वाची असून, त्यांनी हवामान खात्याच्या सूचनेनुसार त्वरित किनाऱ्यावर परत यावे असे आवाहन आजगावकर यांनी केले आहे. कोरोना संकटाचा आम्ही सगळे मिळून मुकाबला करत असताना अरबी समुद्रात वादळ घोंगावत आहे. गोमंतकियानी धैर्यानी या संकटाला सामोरे जावे असे त्यांनी म्हटले आहे. तर या परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.



