सिंधुदुर्ग – मुंबईतून गाड्यांच्या ताफ्यासह कोकणात जात जिल्हाभर लवाजम्यासह मनसोक्त फिरणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर कोकणातून टीकेचे मोहोळ उठले आहे. अनेक लोकांनी त्यांच्या या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. हे सत्ताधारी नेते स्वतःला हवे तेव्हा हवे तसे नियम डावलणार असतील, तर सगळे कठोर नियम फक्त मुंबईत लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या सामान्य कोकणवासीयांसाठीच आहेत का? त्यांच्यासाठीच हा वेगळा न्याय का? अन्याय करण्यासाठी या सरकारने जाणीवपूर्वक कोकणी माणूसच निवडला आहे का? हे खास “दार” कोकणात येण्यासाठी अक्षरश: तडफडणाऱ्या सर्वसामान्य कोकणी चाकरमान्यांसाठी का उघडत नाहीय ?” अशा संतप्त सवालांच्या फैरीच भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊतांवर झाडल्या आहेत.
मुंबईतून कोकणात येणाऱ्या लोक प्रतिनिधींना वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीखाली पाच दिवस ‘होम क्वारंटाइन’ राहणे आवश्यक असल्याचे शासकीय निर्देश आहेत. मात्र त्याची ऐसी की तैसी करत राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे मुंबईहुन सहा गाड्यांचा ताफा घेऊन सिंधुदुर्गात पोहोचले, एवढेच नव्हे तर ते लवाजम्यासकट कोकणात बैठका घेत फिरले असल्याच्या चर्चेनंतर जनमानसात संतापाची भावना उसळली. शासकीय निर्देश डावलत खासदारांनी स्वतः होम कोरोंटाइन न होता बैठका घेण्याचे सत्र आरंभल्यानंतर जिल्हाभरात अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपा नेते प्रमोद जठार यांनी कडक शब्दात खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना म्हंटले आहे की ठाकरे सरकारने कितीही ओरडून सांगितले, तरी कोकणातील मुंबईकरांसाठी दिलेल्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत.मुंबईत कोकणी माणूस लॉकडाऊनच्या हालअपेष्टांमध्ये प्राणांतिक त्रासला आहे. सगळ्या व्यवस्थांचा मुंबईत साफ बोजवारा उडालेला आहे. आधीच खडतर असलेले कोकणी माणसाचे मुंबईतले जीवन आतातर अगदीच असह्य झाले आहे. अनेक गैरसोयींमुळे त्याचा संयम सुटत चाललेला आहे. आजही कोकणी माणसांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे अशा भागात कोरोनाचा प्रसार फारसा नाही, पण अन्य विभाग व झोपडपट्टी भागातून तिथे रुग्ण आढळत आहेत. कोकणवासीय विचित्र सापळ्यात अडकले आहेत.अशा परिस्थितीत दुर्दैवाने महामारी अधिक फैलावून “मुंबईत आमचे काही बरे-वाईट झाले तर आम्हाला पाहायला देखील कोणी असणार नाही. आमच्याकडे पैसे नसतील तरी गावाकडे पेजभात खाऊन देखील गावच्या वातावरणात अधिक सुरक्षित राहू, अशा काकुळतीच्या भावना कोकणी जनता व्यक्त करत आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे सहकार्य करत आवश्यक त्या सर्व आरोग्य तपासण्या करून घेण्याची व गावी जाऊन कोरोंटाइन होऊन राहण्याची त्यांची पूर्ण मानसिकता व तयारी आहे. गावाकडची अनेकांची घरे आज कुलूपबंद असल्याने त्याचीही फारशी अडचण होणार नाही, असे या कोकणी जनतेचे म्हणणे आहे.
मुळात, मुंबईत आणि कोकणात जी शिवसेना वाढली तीच चाकरमान्यांच्या जीवावर, पण आज जेव्हा चाकरमान्यांचा जीव वाचवायची वेळ आली, तेव्हा त्यांच्यासोबत कोणी उभे राहताना दिसत नाही. कोकणी जनता संकटात असताना तिला वाऱ्यावर सोडून आपण तेवढे कार्यकर्त्याना घेऊन कोकणभर फिरायचे हि कसली राऊतांची रीत?
कठिण समय येता कोण कामास येतो हे यातून दिसून आले असून शिवसेनेची गरज सरो वैद्य मरो भूमिका आज उघड झाली आहे. वेळ आल्यावर शिवसेना कशी वागू शकते हे चाकरमान्यांना यातून पक्के कळून चुकले आहे. हेच चाकरमानी भविष्यात शिवसेनेला तीची योग्य जागा नक्कीच दाखवून देतील.
आज स्वतःला कोकणचे लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या खासदार विनायक राऊतांना कोकणवासीय मुंबईकरांच्या या अडचणी, वेदना दिसत नाहीत? या लोकांना कोकणातील त्यांच्या गावात आणण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर करावा असे वाटत नाही? इतर जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार, परप्रांतीय मजूर यांना घराकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी तुमचे सरकार लक्ष जातिनिशी देते, पण जो कोकणी माणूस मुंबईत अडकून पडला आहे, तिथल्या गैरसोयींना त्रासून कोकणात आपल्या गावी – आपल्या माणसात जाण्यासाठी तडफडतो आहे, तो तुम्हाला दिसत नाही?
उद्धव ठाकरे सरकार मुंबईतल्या परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप पोहोचवण्यासाठी केंद्रसरकारकडे परवानगी मागत आहे, त्यांच्यासाठी खास ट्रेन सोडण्याची मागणी करत आहेत. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणत आहेत, की साधारण सहा लाख स्थलांतरीत कामगार व मजूर यांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था याची जबाबदारी राज्याने घेतली आहे. तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिलनंतर १५ मे पर्यंत विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेल्या कालावधीत परराज्यातील कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था केंद्राने करावी!”
परराज्यातील मजूर दिसतो पण आपल्या राज्यातील कोकणी माणूस यांना दिसत नाही. भविष्यात महामारीचा धोका वाढला तर मुंबईत जे दहा लाख परप्रांतीय मजूर आहे, त्यांचे स्थलांतर केले तर त्यांच्या जीवाला धोका राहणार नाही असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. परप्रांतीय मजुरांसाठी एवढ्या तळमळीने पत्र पाठवून केंद्राकडे परवानगीची मागणी करणाऱ्या या ठाकरे सरकारला आधी आपल्या राज्यातील कोकणी माणूस गावी पोहोचवण्याची सुबुद्धी का होत नाही, हे अनाकलनीय आहे. कोकणी माणूस कायद्याचे पालन करणारा आहे, तो परराज्यातील त्या मजुरांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात येत नाही हाच त्याचा गुन्हा आहे का? त्यांच्यासाठी ट्रेन मागवा नाहीतर प्लेन, पण तुमच्या ताब्यात निदान ज्या एसटी बसेस आहेत ना, त्यात भरून आधी या कोकणी माणसांना त्याच्या गावी सोडा! परप्रांतियांच्या आरोग्याची तुम्हाला जास्तच काळजी पडलीय, ते चांगलं आहे. पण या राज्यात इथे मुंबईकर कोकणची जनता बेवारस आहे का, विषाणूचा प्रादुर्भाव वाढला तर त्यांच्या जीवालाही धोका आहे, हे न समजण्याइतके तुमचे मन कोकणी माणसाच्या बाबतीत असंवेदनशील झाले आहे का, असा संतप्त सवाल प्रमोद जठार यांनी केला आहे.
तिथे कोकणात जाऊन लवाजम्यासह फिरत पक्षीय राजकारण करण्यापेक्षा या लोकांच्या अश्रूंची नसेल, तर किमान तुम्हाला केलेल्या मतदानाची तरी किंमत ठेवा. फक्त ‘खास’ माणसांना ‘दार’ उघडून कोकणात घ्यायचे आणि सामान्य कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडून द्यायचे हे कितपत योग्य? इतरांपेक्षाही प्राधान्याने आधी कोकणी माणसांना गावच्या घरी येण्याचा हक्क मिळाला पाहीजे.
कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याची दक्षता बाळगण्याएवढी कोकणी जनता सुज्ञ आहे. तेव्हा आता योग्य काळजी घेत गाड्या भरा, कोकणी माणसाला त्याच्या गावी जाऊद्या. त्याच्या बंद घरात किंवा अन्यत्र त्याला कोरंटाइन करा. जीवघेण्या उन्हाळ्यात त्याचाही जीव शांत होईल आणि मुंबईवरचा ताणदेखील कमी होईल. आज कोकणी जनतेप्रती आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत व आपण त्यांच्या पुर्ततेत नेमके कुठे आहोत हे राऊतांनी आपल्या मनाला विचारावे. कोकणात गरज नसताना फिरून आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवण्यासाठी तिथे वृथा आटापिटा करू नये. त्याऐवजी मुंबईतल्या कोकणी माणसाच्या स्थलांतरासाठी तातडीने पावले उचलावीत, असे प्रमोद जठार यांनी म्हंटले आहे.