सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना कोरोनासोबत आता ‘सारी’ तापाचा धसका अनेकांनी घेतला आहे. सारी तापाचे रुग्ण आठवड्यात दुपटीपेक्षा अधिक वाढले आहेत. आतापर्यंत ११६ जणांना सारीची लागण झाली आहे तर आतापर्यंत या रोगाने १३ बळी घेतल्याने कोरोनापाठोपाठ सारीवर मात करण्याचे आव्हान आहे.
सारी हा समूहरोगाचा एक भाग आहे. त्यात अनेक आजारांचा समावेश आहे. कोरोना विषाणू व सारीचा थेट कोणताही संबंध नाही. तरीही कोरोना हा सारीपैकी एक असल्याचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराला आलेल्यांपैकी १३ जणांचा आतापर्यंत सारी तापाने मृत्यू झाला आहे. सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन फुफ्फुसातील दाब वाढतो.
फुफ्फुसाला सूज येते. न्युमोनिया होऊन रक्तात ऑक्सिजन शिल्लक राहत नसल्याने मेंदू, हृदय, किडनी निकामी होतात. शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे निदान वेळेवर होत नाही. तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात. रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही. विषाणू अतिशय सुक्ष्म असल्याने तपासणीत दिसत नाही. माणसाचे हृदय काम करीत नसल्याने फुफ्फुसे बंद पडून हृदय, किडनीवर त्याचा विपरित परिणाम होतो. कोरोनापाठोपाठ सारी झपाट्याने पसरू लागल्याने अनेकांची पाचावर धारण बसली आहे. या रोगाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे. जिल्हा रुग्णालयाने शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविलेल्या अहवालात सारी तापाने आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सारी तापाचे ११६ रुग्ण सापडले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात ओटवणे येथे लेप्टोचा रुग्ण सापडला आहे. कोरोनापाठोपाठ कोकणात आलेले आजाराचे हे नवे संकट आरोग्य यंत्रणेलाही डोखेदुखी ठराय आहे.



