छत्रपती संभाजीनगर: “विमानाचा अपघात झाल्यानंतर कुटुंबासह महाराष्ट्र व्यथित आहे, पण लोकांसाठी काम तर करावंच लागेल. काहीही झालं तरी माझा दौरा रद्द होणार नाही,” अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला कामाप्रती असलेला निर्धार व्यक्त केला. मंगळवारी सकाळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा अनर्थ टळला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नेमकी घटना काय?
सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी असलेल्या पंकजा मुंडे मंगळवारी सकाळी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील नियोजित सभांसाठी चिकलठाणा विमानतळावरून निघणार होत्या. मात्र, टेकऑफपूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर या घटनेने मोठी खळबळ उडाली.
आईच्या काळजाचा ठोका चुकला आपल्या भावना व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “अजित दादांच्या अपघातापासून मी सतत विचार करतेय की त्या क्षणी विमानात असलेल्यांना काय वाटलं असेल? माझी आई दरवेळी विचारत असते- लँड झाली का? टेकऑफ झाली का? सर्वांची मने हादरलेली आहेत. अनेक लोक मेसेज करून हेलिकॉप्टरने प्रवास न करण्याचा सल्ला देत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नाही.”
दौरा सुरूच राहणार भीती आणि काळजीचे वातावरण असूनही पंकजा मुंडे यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिला. “काळजी करण्याचं कारण नाही, काम तर चालत राहणार,” असे म्हणत त्या पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्या.



