कोकणच्या समुद्रात एप्रिलपासून सुरू होणार रो-रो सेवा, मुंबई – रत्नागिरी प्रवास सुसाट

0
2

मुंबई -गोवा महामार्गाचा १२ तासांचा प्रवास करणार्‍या वाहनचालकांना आता कमी वेळात आपल्या गाडीसह गावी पोहोचणे शक्य होणार आहे. मुंबई -विजयदुर्ग प्रवास केवळ ५ तासांमध्ये करता यावा, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई- विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास करून ही सेवा गणेशोत्सवादरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र तांत्रिक अडचणी आणि काही परवानग्या न मिळाल्याने हा मुहूर्त चुकला आणि आता फेब्रुवारी २०२६ उजाडले तरी मुंबई -विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झालेली नाही.

आता एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. ही सेवा सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा सागरी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर रो-रो सेवेचे संचालन करण्यासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्याकरीता सागरी मंडळाने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या. ही निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये मुंबई -विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू होऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्ग गेली १४ वर्षे रखडल्यामुळे या महामार्गाचा प्रवास १४ तासांचा आणि जिकरीचा झाला आहे. अनेक अपघातांमुळे या महामार्गाची ओळख अपघातग्रस्त महामार्ग अशी झाली आहे. मात्र आता प्रवाशांना रो-रो चा पर्याय उपलब्ध होणार आहे. या रो-रो सेवेचा आंबा वाहतुकीलाही मोठा फायदा होऊ शकेल. सागरी मंडळाने मुंबई- सिंधुदुर्ग प्रवास अतिजलद करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय पुढे आणला. त्यानुसार मुंबई -विजयदुर्ग दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जलमार्ग निश्चित करून विजयदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रूपांतर रो-रो जेट्टीत करण्यात आले.

सागरी मंडळाने सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अनेक मुहूर्त जाहीर केले. मात्र सर्व मुहूर्त चुकले आणि रो-रो सेवा कागदावरच राहिली. आता मात्र सागरी मंडळाने एप्रिलमध्ये ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा चालविण्यासाठी (संचालन) कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या आठवड्यात निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एप्रिलपासून महिनाभर प्रायोगिक तत्वावर ही सेवा प्रथम सुरू होईल आणि ही सेवा यशस्वी ठरली तर कायमस्वरूपी रो रो सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे सागरी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या ही सेवा भाऊचा धक्का ते मांडवा अशी सुरू आहे. या सेवेमुळे अलिबागच्या पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. ही सेवा विजयदुर्ग पर्यंत विस्तारल्यास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटनात मोठी वाढ होऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here