केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता बॅनर वॉर रंगू लागले आहे. देवगड येथे काल लावलेला बॅनर “ते असतानाही नाही, संपवू शकले, ते आता काय संपवणार” “‘दादा’गिरी” या मथळ्याखाली बॅनर लागल्यानंतर आता शिवसेनेकडूनही त्याला कणकवलीत चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे.
“ते राज्यात मंत्री असताना कोकणात पराभूत केले, ते केंद्रात मंत्री होऊन काय फरक पडणार” अशा आशयाचा बॅनर कणकवलीत शिवसेना जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावण्यात आला आहे. हा बॅनर सध्या कणकवलीत चर्चेचा विषय बनला आहे.
या बॅनरच्या वरील बाजूला स्वर्गीय बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे 19 ऑक्टोबर 2014 रोजी “जायंट किलर” असा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरवर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना कार्यकर्त्यांनी विजयोत्सवात उचलून घेतानाच्याही फोटोचा ही समावेश आहे.
तर बॅनरच्या एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद देताना चा फोटो आहे. त्यामुळे देवगड येथे लागलेल्या “त्या” बॅनरला बॅनरनेच शिवसेनेकडून कणकवलीत उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. हा बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात अंतिम टप्प्यात असतानाच कणकवली शिवसेनेच्या जुन्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ लावलेल्या बॅनर मुळे पुन्हा एकदा कणकवलीतील राजकीय वातावरण तापणार आहे.