सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दिवाळी दणक्यात साजरी होत आहे. मात्र, यंदा कानठळ्या बसविणारे फटाके न फुटल्याने मुंबईत गेल्या १५ वर्षातील सर्वात शांत दिवाळी साजरी झाली आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधातील मोहिमेमुळेच यंदा मुंबईत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे फटाके फुटले नसल्याचं सांगण्यात येतं. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जागृती सुरू आहे. त्याला यंदा चांगलं यश मिळालं आहे. यंदा दिवाळीत ध्वनी प्रदूषणाची ११२.३ डेसिबल इतकी नोंद झाली आहे. रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानेही त्यावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येतं. त्या आधी २०१७च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची ११७.८ डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती, असं आवाज फाउंडेशनने म्हटलं आहे. दिवाळीत कमी डेसिबलची नोंद होणं याचा अर्थ लोकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागृती निर्माण होत आहे. त्याशिवाय लोक आता दिवाळी दणक्यात साजरी करताना फटाक्यांचा वापरही कमी करत असल्याचं दिसून आलं आहे.