महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे ?

0
116

‘जे ठरले तेच हवे’ ही शिवसेनेची भूमिका कायम असून, मुख्यमंत्री पद हा सत्तासंघर्षांतील कळीचा मुद्दा ठरला आहे. त्यावर तोडगा निघणे तूर्त तरी कठीण दिसत असल्याने दोन-तीन दिवसांत सत्तापेच न सुटल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ मानली जाते.

शिवसेना सत्तास्थापनेसाठी अद्याप तयार न झाल्याने अखेर गुरुवारी दुपारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांनी राज्यातील पक्षनिहाय संख्याबळ आणि समीकरणांची तसेच राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांशी चर्चा केली. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी विधानसभा निवडणुकांना युती म्हणून सामोरे गेलो असून, शिवसेनेसह सरकार स्थापन करण्याचा जनादेश मिळाला आहे. मात्र, शिवसेना अद्याप सत्ता स्थापण्यास तयार नाही, या साऱ्या गोष्टी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्या. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती राज्यपालांना दिली आहे. सरकार स्थापन होण्यास विलंब होत असल्याने अशा परिस्थितीत घटनात्मक तरतुदींबाबत चर्चा झाली, अशी माहिती पाटील यांनी दिली.

भाजपची आज बैठक

जनादेश मिळूनही सरकार स्थापन करण्यास उशीर झाल्याची खंत व्यक्त करतानाच आज सरकार स्थापनेबाबत भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यात अंतिम निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूर येथे पत्रकारांना दिली. दरम्यान, अन्य पक्षांचे आमदार फोडणे ही भाजपची संस्कृती नसून, अशा प्रकारच्या आरोपांनी दु:ख होत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री पद देण्यास तयार असाल, तरच फोन करा’

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यासाठीचा पर्याय शिवसेनेने खुला ठेवल्याची चर्चा आठवडाभर झाल्यानंतर गुरुवारी शिवसेना आमदारांच्या बैठकीत युती तोडण्याची माझी भूमिका नाही.जे ठरले होते तेवढेच हवे हीच सेनेची भू्मिका असल्याचे उद्धव यांनी सांगितले. आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा, अथवा करू नये, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here