सिंधुदुर्ग – देशाची अर्थव्यवस्था हि ऑइलवर चालते असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तेल आयात केलं जात. आयात केलेलं तेल आपण स्वतः इथे रिफाइन करण्याची गरज आहे. मात्र रिफायनरी ग्रीन असली पाहिजे आणि स्थानिकांचा त्याला पाठिंबा असला पाहिजे असे सांगतानाच दुर्दैवाने यामध्ये राजकारण आल्याने एवढा चांगला प्रकल्प उद्या महाराष्ट्रातून पर्यायाने कोकणातून गेला तर कोकणचाही नुकसान होऊ शकत. त्यामुळे केवळ त्याच नानार असं नाव न ठेवता आणार असं ठेवलं असत तर होऊ शकलं असत अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी नानार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या खासदार प्रभू यांनी आज कणकवलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ विरोधाला विरोध नको. कोकणचा विकास केंद्रस्थानी ठेऊन विचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार उपस्थित होते.
रिफायनरी हि देशाची गरज
यावेळी खासदार सुरेश प्रभू म्हणाले. रिफायनरी हि देशाची गरज आहे. रिफायनरी असावी, ती ग्रीन असावी. मात्र कोणताही प्रकल्प करताना त्यात जनतेची मते समजून घ्यावीत. जनसुनावणीत लोकांनी होकार दिल्यानंतरच प्रकल्पाची अमलबजावणी केली जावी. आज नायजेरियात मोठ्या संख्येने तेलाचे साठे आहेत मात्र या ठिकाणी रिफायनरी नव्हती. त्यांना इतर देशातून तेल रिफाइन करून घ्यावे लागत होते. मात्र आता हाही देश रिफायनरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपी विमानतळाला केंद्राच्या सर्व परवानग्या दिल्या गेल्या
जिल्ह्यातील चिपी विमानतळ कधी सुरु होईल याचा मुहूर्त एकतर ज्योतिषी किंवा राज्यसरकार काढू शकत. परंतु हे विमानतळ सुरु होण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. ३१ जानेवारी पूर्वी सर्व कामे पूर्ण होतील याची ग्वाही राज्य सरकारने केंद्रीय मंत्री हरदीप पुरी याना पत्राद्वारे दिली आहे. आता त्याच्यानंतर हे विमानतळ कधी सुरु करायचं हे राज्यसरकारला ठरवावं लागेल असं ते म्हणाले.
राज्य सरकार असंवेदनशील
निसर्ग चक्रीवादळाची अजूनही नुकसानभरपाई न देणारे एव्हढं अशा प्रकारचं असंवेदनशील सरकार असू शकत याच हे उदाहरण आहे. निसर्गरूपी वादळ येऊन गेलं आणि मानवरूपी संकट लोकांसमोर उभं राहील. राज्य सरकारने सांगूनही मदत दिली नाही. केंद्र सरकारच पथक येऊन गेलं. केंद्राने मदतही देऊ केली. मात्र कोणापुढे हात न पसरणाऱ्या कोकणी माणसाला राज्य सरकारला हि मदत द्यावीच लागेल असे खासदार प्रभू म्हणाले.
कोकणाचा निसर्ग न हरवणारा विकास करू
मुंबई गोवा महामार्गाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. कोकणाचा विकास करताना कोकणाचा निसर्ग न हरवणारा विकास करायला हवा. तेच आपल्याला पहायचा आहे. कोकणात कोणता प्रकल्प येऊ नये किंवा यावा हे ठरविण्याचा अधिकार कोकणी माणसाचा आहे. कोकणचा कोकणपण टिकविणारा आणि सर्वसामान्यांच्या गरज पूर्ण करणारा विकास आपणा सर्वाना अपेक्षित असल्याचे खासदार प्रभू यावेळी म्हणाले.