सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील निसर्गसुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत गुलाबी थंडी आणि येथे पडणारे धुके अनुभवण्यासाठी आता पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात उद्धवस्त झालेला पर्यटन व्यवसाय आता पुन्हा बहरू लागला आहे.
लॉकडाउननंतर आता आंबोली पर्यटन हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली. मुख्य म्हणजे येथे कोरोनाची भीती आता संपल्यात जमा आहे. यामुळे पर्यटन व्यावसायिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला. आंबोलीत यंदाही गेल्या वर्षीएवढा सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि कोरोना यांना वैतागलेल्या येथील स्थानिकांना आता थोडा दिलासा मिळाला.
हॉटेल व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पर्यटन व्यावसायिक आता पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. लॉकडाउन संपल्याने आता वेगवेगळ्या भागातून पर्यटक गोव्यात जाताना येथे थांबू लागले आहेत. आंबोलीत रहायलाही पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक समाधान व्यक्त करीत आहेत. आंबोलीत पर्यटनदृष्ट्या अनेक बाजूंनी विकास करण्यासाठी राज्यकर्त्यांना अपयश आले तरी निसर्गावर अवलंबून पर्यटन मात्र अजून टिकून आहे. त्यामुळे आंबोलीचे आकर्षण कायम आहे. त्यामुळे गेले ८ महिने जवळपास बंद असलेला इथला हॉटेल व्यवसाय आता रुळावर येत आहे. पर्यटकांमध्येही कोरोनाची भीती आता राहीली नसल्याचे चित्र आहे. अजूनही मुक्कामाचे प्रमाण खूप वाढलेले नाही; मात्र पर्यटक येथे काहीकाळ थांबणे पसंत करत आहेत. यामुळे खाण्यापिण्याशी संबंधित उलाढाल वाढली आहे. त्यामुळे अर्थकारणाला हळूहळू गती येत आहे.
आंबोलीत सध्या धुक्याची चादर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. किंबहुना हेच धुके पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. यावर्षी सर्वाधिक पाऊस आंबोलीत झाला. त्यामुळे येथील धुक आणखीन महिनाभर राहील. असे येथील पर्यावरण तज्ञ काका भिसे यांनी सांगितले.