सिंधुदुर्ग – विजयदुर्ग जवळ समुद्रात बुडालेल्या पार्थ या तेल वाहू जहाजातून तेलगळतीला सुरुवात झाली आहे. गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या जहाजातून होणारी तेल गळती अपघाताच्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला पसरणार आहे. त्यामुळे या तेल गळतीचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील समुद्र किनाऱ्यांना बसणार आहे.
विजयदुर्ग किनाऱ्यापासून ४० ते ५० वाव क्षेत्रामध्ये समुद्रात दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणारे पार्थ नावाचे जहाज बुडाले आहे. हे तेल वाहू जहाज बुडाल्याने किनारी भागामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या जहाजातून कोणत्याही क्षणी तेल गळती होऊ शकते असा इशारा देण्यात आला होता. अखेर या तेल गळतीला सुरुवात झाली आहे. १०१ मीटर लांबीचे हे तेल वाहू जहाज आहे १६ सप्टेंबर रोजी ते अपघातग्रस्त झाले होते. रत्नागिरी कोस्ट गार्ड कडून या जहाजावरील कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले होते.
या जहाजातील तेल गळतीचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. कोकणातील मासेमारीची काही प्रमाणात यामुळे धोक्यात येऊ शकते. तर जहाज अपघात ग्रस्त झालेल्या ठिकाणापासून दक्षिण पूर्व दिशेला म्हणजे आग्नेय दिशेला या जहाजातील तेल पसरणार असल्याची माहिती गोवा समुद्री विज्ञान संस्थेने दिली आहे.
तेल गळतीपासून होणारे परिणाम रोखण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या भागात २५० लिटर ऑईल स्पील डिस्परसंट (OSD) ची फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे. तेल गळतीच्या ठिकाणी पॅण्डी (PANDI) क्लबच्या स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर या तेल गळतीच्या स्थितीचा सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ, पोलिस निरीक्षक सागरी सुरक्षा ब अनिल जाधव, वेंगुर्ल्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजर्षी सामंत सहभागी होते.